Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, ११ सप्टेंबर, २०२४

विवाह जुळण्यास विलंब होणे एक गंभीर सामाजिक समस्या...



आज मुलीच्या लग्नाचे वय उलटून चालले आहे 30 ते 32 वर्षाच्या  पुढे लग्न नकोच अशी भूमिका मुलं,मुली  घेताना दिसत आहे. सामाजिक दृष्ट्या ही फार मोठी गंभीर समस्या होत चालली आहे. पालक याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत ही खेदाची बाब आहे. पालकांनो  वेळीच सावध व्हा अन्यथा एका मोठ्या सामाजिक प्रश्नाला आपण जन्म देत आहोत. ज्याचा इलाज विधात्याचेही हातात नाही. आज सर्वच समाजात मुला मुलीचे विवाह वेळेवर न होणे लांबणे आणि त्यातून विवाहाची इच्छाच न राहणे अशा अवस्थेकडे समाज चालला आहे. मुला मुलींचे विवाह न जमण्याचे अनेक कारणे असली तरी एक मात्र हमखास आहे ते म्हणजे नोकरी करणाराच मुलगा पाहिजे. शिवाय त्याच्यावर इतर कुठलीही जबाबदारी नको वगैरे मुली बरोबर त्यांच्या पालकांच्या अपेक्षा इतक्या अवास्तव वाढत चालले आहेत की त्यांच्याकडे पाहून हसावे की रडावे  हेच  समजत नाही. एकीकडे मुलीची संख्या कमी होत चालली असताना मुलांना जणू काही किंमतच राहिली नाही अशा भावना काही मुलींच्या पालकांची झालेली आहे. हा सामाजिक समतोल अनेक प्रश्नांना जन्म देत आहे. मुलीला एखादे अनुरूप स्थळ चालून आले तरी त्याला त्वरित प्रतिसाद न देणे स्थळ पाहून झाल्यावर स्वतः काही न कळविता दुसऱ्याच्या उत्तराची वाट पाहणे होकार/ नकार टाळाटाळ किंवा विलंब करणे  घोंगडे भिजत ठेवणे म्हणजेच त्या स्थळाला दुसरीकडे जायला वाट मोकळी करून देणे.
     वधू वर केंद्रातून किंवा वधू वर परिचय पुस्तकातून  कितीही बायोडाटा आले तरी आणखी काही नवीन येत आहेत का याची वाट पाहणे असे प्रकार मुलीच्या पालकाकडून घडत आहेत.      सगळं सगळं जुळत असतानाही याहीपेक्षा आणखी कुठलं नवीन स्थळ असेल का? हा शोध सुरूच ठेवणे शुल्लक बाबीचा दोष काढणे रंग, उंची पगारातील तफावत शेती नाही असली किंवा घेतली  असेल तर करणार कोण? पुणे मुंबईत फ्लॅट नाही अशी कारणे देणे असे प्रकार सुरू आहेत जे क्लेशदायकआहे.  व त्यामुळेच लग्न जोडण्याला विलंब होतो. व मुलीचे वय वाढत जाते व मग एक गंभीर प्रश्न व गंभीर समस्या निर्माण होते.
      विवाह हे एक सामाजिक बंधन आहे. समाजव्यवस्था आणि कुटुंब व्यवस्था टिकवण्यासाठी विवाहाचे (Marriage) महत्त्व आहे. अनेक धर्मात हा एक विधी, संस्कार, करार या स्वरूपात पाहिला जातो.
उच्चशिक्षित मुली या करिअर आणि नोकरीस प्राधान्य देणाऱ्या असतात. द्यायला पाहिजे परंतु लग्न करताना आपल्या वयाचा सुद्धा विचार केला पाहिजे करिअर करता करता जर वय निघून गेल तर पुढे लग्न होणे कठीण जाते.विवाह जमवताना खूप चौकशी, पाहणी करण्यात वेळ वाया घालवला जातो.
अनेक मुला-मुलींचे वडील स्थळ सुचवल्यानंतर उशिरा प्रतिसाद देत असतात. अत्यंत किरकोळ गोष्टींवरून विवाह जमवण्यास नकार दिला जातो. त्यामुळे अटी-शर्तींच्या कैचीतून विवाह जमवणे अशक्य होऊन बसते.
        काही ठरावीक अटी असणे आणि त्या सांगणे आवश्यक आहे. मात्र, क्षुल्लक बाबींवरून स्थळ मोडणे योग्य ठरत नाही. ज्योतिष मानायचे की नाही हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. मात्र, पत्रिकेतील गुण जास्त असल्यांपेक्षा आपल्या मुला-मुलीतील सद्गुण कसे वाढीस लागतील याचा विचार करायला पाहिजे. 
       असं जरी असलं तरी विवाह जमणे आणि तो टिकवणे एक तारेवरची कसरत आहे. विवाह जमवताना अनंत अडचणी येतात.अनेक प्रकारच्या गोंधळातून आणि त्रासातून जाणारी ही प्रक्रिया झाली आहे. विवाहास विलंब होणे, विवाह न जमणे ही एक सामाजिक समस्या बनली आहे. पूर्वीच्या काळी एखाद्या मुला-मुलीचा विवाह घरातील वडीलधारी मंडळी, कर्तें व्यक्ती परस्पर ठरवायचे. अनेकदा मुले-मुली एकमेकांना थेट लग्नातच पाहायचे. दोन कुटुंबांचे पूर्वापर चालत असलेले संबंध असल्याने अल्पवयातच विवाहाची तोंडी बोलणी व्हायची. मात्र, दिवसेंदिवस काळ बदलत आहे. समाजात चौकसपणा वाढला, माणसं हुशार झाली, मुला-मुलींचे उच्च शिक्षण झाले, संगणक आणि मोबाईलच्या युगात आणि करिअरचा विचार करून उत्पन्नाचा, शिक्षणाचा विचार करून विवाह ठरायला लागले. मुलीच्या वडिलांच्या डोक्यात नेमकं काय चालू आहे याचा ठाव लागत नाही. अनेक लग्न संबंध जमवताना
            मुली-मुलांबरोबरच   दिसण्याची तुलना करतात, अनेकदा पगाराची तुलना करतात, शिक्षणाची तुलना करतात आणि चांगल्या मुलांना नकार देतात.
वास्तविक विवाह झाल्यानंतर त्यांचा एक परिवार तयार होणार आहे, एकमेकांना समजून घेणारा, मान आणि मन राखणारा, सुख-दुख यामध्ये सोबत राहणारा साथीदार म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे.
     अनेकांचे पगार लग्नानंतर वाढतात. घर, गाडी, बंगला या बाबी होण्यास वेळ लागतो, त्याला वेळच द्यावा लागतो. मुलगा निर्व्यसनी, शुद्ध चरित्राचा सुस्वभावी आहे का? याबाबत अधिक चर्चा आणि चौकशी करणे अपेक्षित आहे.
चांगल्या पगाराची नोकरीवाल्याचा शोध घेण्यापेक्षा एखादा व्यावसायिक चांगले पैसे कमवत असेल तर त्याचा देखील विचार झाला पाहिजे.
मुलींप्रमाणे मुलांच्या देखील अनंत अटी आहेत. मुलगी उच्चशिक्षित असली पाहिजे मात्र घरी राहणारी असावी, तिने नोकरी करू नये, अशी काहींची अट असते जे अनेकदा शक्य होत नाही.
विवाह झाल्यावर देखील त्यानंतरचे फारकतीचे प्रमाण याच कारणामुळे वाढत असते. लग्नाअगोदरच मुला-मुलींनी शिक्षण किती असावे, नोकरी व्यवसाय करावा की नाही, या बाबी ठरवून घेणे आवश्यक आहे.
हुंडा प्रथा मोठ्या प्रमाणात समाजात होती. प्रबोधनाने ती आजकाल बऱ्यापैकी कमी होत आहे. ही चांगली बाब असली तरी दुसरीकडे विवाहाचा वाढता खर्च चिंताजनक विषय बनला आहे. अनेक विवाह हे विवाह सोहळ्याच्या मागणीवरून मोडतात हे योग्य नाही. विवाह जमवताना मुला-मुलींचा सल्ला घ्यावा त्यांना समजून घेणे आणि ते चुकत असल्यास त्यांना समजावून सांगणे आवश्यक आहे.नात्यागोत्यातील आणि विवाह जमवणाऱ्या लोकांवर विसंबून राहण्यापेक्षा घरात चर्चा करून योग्य निर्णय घेणे कधीही फायदेशीर असते. विवाह जमवणे आणि विवाह यशस्वी होणे हा खूप मोठा विषय आहे. तूर्तास एवढेच..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध